Friday, January 3, 2020

*वो भूली दास्तान,फिर याद आ गई*......

*दिसलीस तू.......*

खूप वर्षांनी पुन्हा शहरात आलो.
बहिणीच्या घरी मुक्काम,
ऑफिसची खूप महत्वाची मिटिंग, थोडं टेन्शन होते,
आवराआवर चालू होती.
तरी उशीर झालाच.
भाच्याची बाईक घेऊन निघालो. ट्राफिक जाम होते,
उशीर होऊ नये म्हणून नेहमीचा रस्ता सोडून शॉटकट पकडला 
पण तिथेही गर्दी.
लहानपणीच्या भटकंतीमुळे 
सगळे गल्ली-बोळ माहिती होते
डोक्यात मिटिंगचाच विचार,
त्याच तंद्रीमध्ये. 
रस्ते बदलत पुढे पुढे जात होतो
असंच रस्ते बदलत जाताना, ट्राफिक जाममध्ये अडकलो.
उशीर झाला होता,
आणि सहज समोर लक्ष गेले, 
तर समोर ती .........
तिला पाहिले अन काय सांगू,
एकटक पाहतच राहिलो.
क्षणात विचारांची तंद्री तुटली, मिटिंग पार विसरलो  
कारण तिचा महिमाच मोठा,  
तिला पाहून सरसर मन मागे धावत गेले.आठवणींचे एकेक फोल्डर उघडत गेले,
आयुष्यातील निरागस,मोरपंखी, रंगबिरंगी आठवणी जाग्या झाल्या.
तिच्यासोबत घालविलेले सगळे क्षण डोळ्यासमोर आले.
तो सुवर्णकाळ दिसायला लागला 
माझ्यासमोर ती इमारत होती 

ती माझी *शाळा* होती.

वेळ कोणासाठी थांबत नसतो
दहावी पास झालो,
नंतर आयुष्य बदलत गेले 
प्रायोरिटी बदलल्या,अनेक नवीन गोष्टी जोडल्या गेल्या. कॉलेज,शिक्षण, नोकरी, व्यवसाय, लग्न,संसार,
जबाबदाऱ्या या सगळ्यात शाळा केव्हाच मागे पडली.
विसरलो नाही पण कधी आठवण सुद्धा आली नाही.
बोलण्यातून शाळेचा उल्लेख केला जायचा,  
नोकरी निमित्त दुसऱ्या शहरात रहायला गेलो.
फेसबुक,व्हॉटसपवर शाळेतले मित्र भेटले,
पण कधी शाळेजवळ येण्याचा योग आला नव्हता. 
आज घरातून महत्वाच्या कामासाठी म्हणून निघालो  
आणि अचानकपणे......
थँक्यू ट्राफिक जाम.
२५ वर्षानंतर  शाळेजवळ आलो 
आणि ........हरवून गेलो.
क्षणाचाही विचार न करता गाडी बाजूला पार्क केली
उगीच डिस्टर्ब नको म्हणून, मोबाईल सायलेंट वर टाकला 
मनाने त्या सोनेरी दिवसात जाऊन पोहचलो.पुन्हा इतक्या वर्षानंतर शाळेच्या गेटवर उभा होतो.
जबरदस्त फिलिंग होते.
एकेक पायरी चढू लागलो 
तसतसा आठवणींचा खजिना उलगडू लागला.
काळ,जग,मी सगळं काही बदललं
पण माझी शाळा तशीच होती.
तिला डोळ्यात साठवत होतो.
तेवढ्यात शिपाई मामांनी विचारले 
“काय पाहिजे” आवाजाने भानावर आलो 
“नक्की सांगता येणार नाही,थोडा वेळ द्या,” 
मामा गोंधळले,विचित्र नजरेने पाहू लागले.
“मी या शाळेतच होतो,तीस वर्षापूर्वी,ही माझीच शाळा”
नकळत बोलून गेलो पण “माझी शाळा” म्हणताना अंगावर शहारा आला.  
वयस्कर शिपाईमामा छान हसले.
माझ्या मनात काय चाललंय ते त्यांना बरोब्बर कळले.
असे भरपूर अनुभव त्यांच्याकडे असणार.
“किती वर्षांनी आलात”
“पंचवीस वर्षांनी,दहावीनंतर आत्ताच,”
“सरांना,भेटा”
मुख्याध्यापकांना भेटलो.त्यांच्या परवानगीने भारावलेल्या अवस्थेत शाळेत फिरू लागलो.
वेगवेगळ्या मजल्यावर असलेलले पाचवी ते दहावीपर्यंतचे माझे वर्ग पाहिले.
पुन्हा पुन्हा पाहिले,मनात जी अवस्था त्यावेळेस होती.
ती इथे मांडता येणार नाही. 
जुन्या आठवणींनी इमोशनल झालो.
“टन,टन,टन,टन,” तोच ओळखीचा घंटेचा आवाज कानावर पडला.
मधली सुट्टी झाली
इतकावेळ असलेली शांतता फुटली.
किलकिलाट सुरु झाला. जागोजागी मुलांचे थवे दिसू लागले, एकाच युनिफोर्म मधले,गळ्यात हात घालून फिरणारे,जग विसरून एकमेकांशी बोलण्यात गुंग झालेले मुले पाहून सगळे शाळकरी मित्र आठवले.
जागा मिळेल तिथे,बाकावर,गोल करून,एकट्यानेच असे सगळे डबे खाण्यात हरवले.
फार फार मस्त वाटत होते. 
तळमजल्यावर असलेल्या वर्गात गेलो.तो माझा नववीचा वर्ग .
खिडकीजवळच्या माझ्या आवडत्या बाकावर बसलो.
आ हा हा फार भारी वाटलं!!!!
हळूच बाकावर काही जुन्या खाणाखुणा सापडतायत ते पाहिले.
नंतर तिथे गेलो जिथे शाळेत असताना जायला घाबरायचो
“टीचर रूम” 
आज देखील तिथे जाताना मनात थोडी धाकधूक होतीच.
शिक्षकांना भेटलो,माझ्या वेळचे कोणीच नव्हते.सर्वचजण नवीन.
सर्वांना नमस्कार करून बाहेर पडलो.
लायब्ररी,प्रयोगशाळा,सायकल पार्किंग,हॉल
शाळेत असताना जिथे जायचो त्या सर्व ठिकाणी गेलो नंतर पाण्याच्या टाकी जवळ गेलो. 
लहानपणी करायचो तशी हाताची ओंजळ करून पाणी पिले.
डोळ्यात आलेले पाणी तोंडावर पाणी मारून पुसून टाकले.
एकदम फ्रेश झालो.तृप्त होऊन शाळेच्या बाहेर आलो.
भारावलेल्या अवस्थेतून वास्तवात आलो.
मोबाईलवर बत्तीस मिस कॉल,एकोणीस मेसेज आले होते.
काहीच वाटले नाही कारण ते नेहमीच.
आज मी मात्र एकदम खुशीत होतो.
शाळेच्या सोबत मस्तपैकी सेल्फी काढला आणि व्हॉटसपवर पोस्ट केला सोबत कॅप्शन टाकले 
*वो भूली दास्तान,फिर याद आ गई*................................

No comments: